Monday 15 May 2023

दिनविशेष 15 मे जागतिक कुटुंब दिन | 15 May World Family Day

दिनविशेष 15 मे जागतिक कुटुंब दिन


१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्स मध्ये सर्वप्रथम 'जागतिक कुटुंब दिन' साजरा करण्यात आला होता. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेकदा मुलांची त्यातून फरफट होते. मुळातच पाळणा घरापासून आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मुलांना घरच्या संस्काराची उणीव भासतेच. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या संकल्पनेचे अनुकरण केल्याने नवीन पिढीला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आजीच्या हातचे जेवण, आजी आजोबांच्या गोष्टी या सुखाला मुले मुकतात. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबाची जाणीव होण्यासाठी दरवर्षी १५ मे रोजी ‘जागतिक कुटुंब दिन’ साजरा केला जातो. भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत. याचे कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही. या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे. 


‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ या घोषणेच्या आजच्या जगात एकत्र कुटुंबांची संख्या कमी झाली आहे. परंतु असं असलं, तरी अलीकडच्या या विभक्त कुटुंब पद्धतीला तडा देत आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, चुलत भावंडे अशा भल्या मोठया गोतावळ्यासह राहणारी काही ‘मोठी सुखी कुटुंबं’ ही आहेतच. भारतीय कुटुंब पद्धतीबाबत विचार केला असता प्राथमिक व संयुक्त कुटुंब पद्धत एकविवाही व बहुविवाही कुटुंपद्धत, मातृसत्ताक व पितृसत्ताक कुटुंबपद्धत आढळून येते. कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह. खरतर माणसामधील नाती ही आपल्या जन्मावरून विवाहवरून अथवा एखाद्याला दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. 


एकत्र कुटुंबसंस्थेत आजी-आजोबा, आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी, काका-काकू त्यांची मुले-मुली असे घटक असतात. साधारण: वडील हा कुटुंबाचा प्रमुख असतो. भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. प्राचीन काळापासून अगदी रामायण महाभारताच्या काळात आपण पाहिले तर, एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. आज बायका संसाराला हातभार म्हणून नोकऱ्या करायला लागल्या आहेत. त्यामुळे नवरा बायको दोघे नोकरीसाठी बाहेर असतात. त्यांची मुले शाळेत असली तरी, त्यांना डब्यात पोळी-भाजी ऐवजी कुरकुरे, केक, ड्रायफुड असे काहीतरी दिले जाते. कुटुंब म्हटलं म्हणजे एक माळच आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्याने गुंफल्या जाते. कुटुंबात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा घटक असतो. संकटाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीत एकजुटीने संकटाचा सामना करतात. कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबाचे ऐक्य नेमहीसाठी टिकून राहील, हा सुखी कुटुंबाचा खरा महामंत्र आहे. आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खरतर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही.


कुटुंबापेक्षा मोठं धन...

कोणतंच नाही !

वडिलांपेक्षा चांगला सल्लागार...

कोणीही नाही !

आईच्या सावलीपेक्षा मोठं जग...

कोणतंच नाही !

भावापेक्षा उत्तम भागिदार...

कोणीही नाही !

बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक...

कोणीही नाही !

कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं...

दुसरं जग व जीवन असूच शकत नाही !

No comments:

Post a Comment

22 January 2024 आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबंधित दररोजच्या बातम्या.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबं...