दिनविशेष :- 03 जून - ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम
संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here
भारताने स्वातंत्र्या नंतरच्या काळात अनेक कटू गोड आठवणी जपून ठेवल्या आहेत. काही घटना अशा आहेत की त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर आपला कधीच न मिटणारा ठसा उमटवला आहे. त्यापैकीच एक घटना म्हणजे १९८४ झाली झालेल्या शीख दंगली आणि अमृतसरचे सुवर्ण मंदिर रिकामे करण्यासाठी घडवून आणलेलं ऑपरेशन ब्ल्यू स्टार. ज्याप्रमाणे ६ जून १९८४ हा शिखांच्या इतिहासा मधील भयावह दिवस म्हणून ओळखला जातो, त्याच प्रमाणे त्याला कारणीभूत असलेले ऑपरेशन ब्लू स्टार स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी ऑपरेशन मानले जाते. या दिवशी नागरिकांच्या धार्मिक भावनांना छेद देण्यात आला, तर दुसरीकडे भारतीय सुरक्षा एजन्सीच्या मते फुटीरतावादी ताकदींशी लढण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. अमृतसर मधील शीख धर्माचे पवित्र हरिमंदिर साहिबच्या (गोल्डन टेम्पल) परिसरा मध्ये विद्रोही खलिस्तान समर्थक जनरल भिंद्रनवाले सिंह आणि त्यांचे समर्थक लपलेले होते. त्यांना जेरबंद करण्यासाठी भारतीय सैन्याद्वारे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान एक लष्करी मोहीम चालवण्यात आली होती, तेच ऑपरेशन ब्लू स्टार होय. त्यावेळी पंजाब मधील फुटीरतावादी सेना भिंद्रनवालेच्या नेतृत्वाखाली सशक्त होत होती, ज्यांना पाकिस्तान मधून समर्थन मिळत होते. भिंद्रनवाले याने हरिमंदिर साहिब मंदिरा मध्ये आपला डेरा टाकला होता. तेथून तो आपल्या विद्रोही कारवाया करत असे. याच देशविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी भारत सरकारने कठोर पाउले उचलण्याचे ठरवले.
ऑपरेशन ब्लू स्टार चा इतिहास
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आदेशावरून, भारतीय सैन्याने शीख जहालमतवादी धार्मिक नेता, जनरल सिंह भिंद्रनवाले आणि त्याच्या सशस्त्र अनुयायांना बाहेर काढण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरा मध्ये घुसखोरी केली. गेल्या दोन वर्षा मध्ये भिंद्रनवालेनी हरएक प्रकारे आपला विरोध सुरु ठेवला होता. त्याची इच्छा होती की, भारत सरकारने आनंदपूरचा प्रस्ताव मंजूर करावा आणि शिखांसाठी एक वेगळे राज्य खलिस्तान तयार करण्यास परवानगी द्यावी. १९८२ मध्ये हा विरोध अतीशय तीव्र झाला. सर्व खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या नेत्यांनी १९८३ च्या मध्या पर्यंत विस्फोटक पदार्थांसह मंदिराच्या परिसरामध्ये तळ ठोकला. जेव्हा भिंद्रनवालेने मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसरा मध्ये भक्कम तटबंदी निर्माण केली, तेव्हा भिंद्रनवालेला बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधीनी भारतीय सेनेकडून सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. गुरुद्वाराशी जोडल्या गेलेल्या शीख धर्मियांच्या भावना आणि सुरु असलेला गदारोळ पाहता तत्कालीन सैन्याचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सिन्हा यांनी या हल्ल्या विरूद्ध उत्तर देण्याचे ठरवले. त्यांनंतर लगेचच जनरल एस.के. सिन्हा यांचे बदली झाली आणि जनरल अरुण श्रीधर वैद्य यांना भारतीय सेनेचे चीफ म्हणून नियुक्त केले, ज्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची योजना आणि नेतृत्व सांभाळले. भारतीय सैन्याने २ जूनच्या रात्री आक्रमण केले आणि ३ जूनला पंजाब राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. सैन्याने मंदिरावर हल्ला केला, शिखांच्या धार्मिक स्थळाची नासधूस केली. ऑपरेशनचा परिणाम असा झाला की, भिंद्रनवाले याचा यामध्ये मृत्यू झाला. सेना, नागरिक आणि फुटीरतावादी यांच्या मध्ये झालेले हे एक आकस्मिक युद्ध ठरले. ५ जूनला रात्री सैन्याने सुरु केलेल्या या कारवाई मुळे ६ जूनला संध्याकाळ पर्यंत सुवर्ण मंदिर अतिरेक्यांच्या ताब्यातून सोडवण्यात आले होते. पण दुर्दैव म्हणजे शिखांच्या श्रद्धेचे केंद्र असलेलं अकाल तख्त या कारवाईत पूर्णपणे उध्वस्त झालं. सुवर्ण मंदिरावर झालेल्या हल्ल्याची जगभरा मधील शिखांनी टीका केली. देशाच्या भल्यासाठी जरी हे पाउल उचलले असले तरी त्यामुळे त्याच देशातील शीख नागरिकांच्या मनावर मात्र कधीही भरता येणार नाही असा आघात झाला. त्यांचे परमपूज्य धार्मिक स्थळ नष्ट झाले, याचा विरोध म्हणून कित्येक शीख प्रशासकांनी राजीनामे सुद्धा दिले.
*ऑपरेशन ब्लू स्टार नंतर चे परिणाम*
* ऑपरेशन ब्लू स्टारमुळे दुखावलेल्या शीख समाजामध्ये प्रतीशोधाची भावना निर्माण झाली. सूड घेण्याच्या द्वेषामध्ये अनेक लोक मारले गेले.
* ऑपरेशन ब्लू स्टार ज्यांच्या सांगण्यावरून झालं, त्या इंदिरा गांधींची दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्याचा परिणाम म्हणून दिल्ली मध्ये शीख समाजा विरोधात दंगली उसळल्या.
* १३ वे सेना प्रमुख, जनरल ए.एस. वैद्य, ज्यांनी या ऑपरेशनचे नेतृत्व केले होते, त्यांची सेवानिवृत्ती नंतर पुण्यामध्ये हत्या करण्यात आली होती.
* टोरांटो-माँट्रियल-लंडन-दिल्ली असा मार्ग कापणारे एयर इंडियाचे विमान बॉम्बने उडवले गेले आणि त्यात दुर्दैवाने सर्वच्या सर्व ३२९ प्रवासी मारले गेले.
एकूणच ऑपरेशन ब्लू स्टार भारतीय इतिहासात कित्येक कटू अध्याय लिहून गेले. ३२ वर्ष या घटनेला उलटून गेल्या नंतर दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणात आरोपी सज्जन कुमार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शीख विरोधी दंगलीत जखमी झालेले, मारले गेलेले हजारो लोक, त्यांचे नातेवाईक यांच्या जखमेवर फुंकर घातली गेली आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. पंजाब आता आपला इतिहास मागे सोडून प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर झाला आहे. पण ५ जून १९८४ ची ती काळरात्र अजूनही पंजाबी माणसाच्या नव्हे, तर भारतीयाच्या मनात घर करून आहे. ज्या रात्री एका उपासनेच्या स्थळाला अतिरेक्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी खुद्द भारतीय सैन्य हत्यारबंद होऊन उतरलं होतं.
No comments:
Post a Comment