17 मे दिनविशेष - जागतिक दूरसंचार दिन
टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी १७ मे १८६५ ला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. याची सुरुवात १८६५ पासून करण्यात आली असली तरी, १९६९ पासून खऱ्या अर्थाने भारतातही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर २००६ मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या एका विशेष कॉन्फरन्समध्ये जागतिक दूरसंचार दिवस, सूचना आणि सामाजिक प्रसारण दिवस एकाच दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूरसंचार क्रांती ही जगातील सर्वात महत्त्वाची आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाची क्रांती मानली जाते. यामुळे जगाची आणि पर्यायाने प्रत्येक मानवाची छबी बदलली गेली आहे, मोबाईलचा स्मार्टनेस आता व्यक्तित्वात प्रकट होतो आहे. आज दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेत भारत सर्वात वेगाने आगेकूच करीत आहे. भारताने ४-जी, ५-जी क्रांतीत आपले मानांकन कायम ठेवले असले तरी जपान आणि चीन याही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. १८८१ मध्ये भारत सरकारने ओरिएंटल टेलिफोन कंपनीकडे पहिल्या सरकारचा निर्णय रद्दबदल करीत इंग्लंडच्या ओरिएंटल टेलिफोन कंपनीला कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे टेलिफोन सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानुसार २८ जानेवारी १८८२ पासून भारतात मुंबईसह तीन ठिकाणी टेलिफोन एक्सेंज सुरू झाले. जागतिक दूरसंचार क्षेत्राने दिलेली ही सर्वात महत्त्वाची देण होती. मोबाइलच्या आधी सर्वत्र टेलिफोन अर्थात लॅण्डलाइन फोन होते. मोबाइल आल्यानंतरदेखील लॅण्डलाइन अस्तित्वात होतेच. मात्र मागील पाच ते सात वर्षांत मोबाइल क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती झाली. या मोबाइल्सने टेलिफोनच काय तर इंटरनेट व लॅपटॉपचीदेखील जागा घेतली. यामुळे आता लॅण्डलाइन हळूहळू कमी होत चालले आहेत.
भारतातील दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांच्या संख्येने फेब्रुवारीत १.१८ अब्जांचा आकडा पार केला आहे. पण एके काळी लोकप्रिय असलेल्या लँडलाइन फोनची मागणी मात्र आता प्रचंड प्रमाणात घटली आहे. स्वस्त दरात उपलब्ध होणारे हँडसेट, कंपन्यांमधील वाढती स्पर्धा आणि दूरसंचार सेवेचा स्वस्त दर या तीन प्रमुख कारणांमुळे लँडलाइनला फटका बसला आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्राने संपूर्ण जगातल्या दूरसंचार क्षेत्रांच्या यादीत दूसरे स्थान प्राप्त केले आहे. तर या यादीतले पहिले स्थान चीन कडे आहे. जगभरात एका तासात दोन कोटींहून अधिक स्मार्ट फोन्सची विक्री होते, भारतात २०१३ मध्ये २० कोटी इंटरनेट ग्राहक होते, तर आज तीच संख्या ५० कोटींहून अधिक झाली आहे.
No comments:
Post a Comment