दिनविशेष 16 मे - मराठा सेनानी मुरारबाजी देशपांडे स्मृतिदिन
स्मृती - १६ मे १६६५ (सातारा)
महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडे यांचे मूळ गाव. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले. जावळीच्या चंद्रराव मोर्यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजे भोसले यांना मोर्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजी यांच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी देशपांडे यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्याच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे सोबत बोलणी सुरू केली, पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थिती मध्ये देखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीचा १६ मे १६६५ रोजी या लढाईत अंत झाला.
No comments:
Post a Comment